म्यानमार सीमेजवळ दहशतवाद्यांचा हल्ला, तीन जवान शहीद
मणिपूर – भारताच्या सर्वच सीमाभागातील लोक असुरक्षित असून आता म्यानमारमधील मणिपूरमध्येही दहशतवाद्यांनी धुमाकूळ माजवला आहे. चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या जवानांना लक्ष्य केलं. यामुळे तीन जवान शहीद झाले असून सहा जवान जखमी झाले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, यात सहा जवानही गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर अंधाधूंद गोळीबार केला. या घटनेनंतर लष्करानं परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “आसाम रायफल्सची तुकडी सीमेलगत असलेल्या खोंगटाळ येथील त्यांच्या छावणीवर जात होती. त्यावेळी आयईडीचा भयंकर स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.”
हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांच्या शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे. त्याचबरोबर भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मागील वर्षीही नोव्हेंबर महिन्यात चंदेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी छावणीवर बॉम्ब फेकले होते.