म्यानमारमध्ये पूरस्थिती बिघडली – एक लाखाहून अधिक लोक झाले बेघर
यांगून (म्यानमार) – म्यानमारमधील पूरस्थिती अधिकच बिघडली आहे. पुरामुळे एक लाखापेक्षा अधिक लोक बेघर झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. होड्यांच्या साह्याने पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आणि सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य युद्धपातळीवर चालू आहे. या पुरात तीन लष्करी जवानांसह 11 जण मरण पावले असल्याचे आपत्ती निवारण विभागाचे अधिकारी न्वाय सोई यांनी सांगितले आहे. नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या पीडिताना सोडविण्यासाठी गेलेले हे सैनिक गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होते.
पुराचे पाणी तीन चार दिवसात कमी होईल असा अंदाज करणाऱ्या लोकांना अधिक सावधगिरीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. पुरात अडकलेल्या, असहाय लोकांना वाचवण्याचे आमचे काम चालू असून, तेवढी आमची क्षमता आहे, असे रेड क्रॉस सोसायटीचे महिती संचालक ये विंट आंग यांनी सांगितले आहे.
सन 2015 मध्ये आलेल्या भयंकर पुरात शंभरावर लोक मारले गेले होते आणि 3,33,000 पेक्षाही अधिक लोक विस्थापित झाले होते. राष्ट्रसंघाने सोमवारी या पुराबद्दल मोठी चिंता व्यक्त केली आहे.