मोबाईलवरुन पालक रागावले; तरुणानं गळफास घेवून केली आत्महत्या
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
मोबाइलमध्ये नेहमी मग्न असल्यानं घरचे रागावले म्हणून २० वर्षीय तरुणानं गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील काशिमबेग गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची मंचर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हृतिक सुरेश मानकर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मंचर येथील महाविद्यालयात तो शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृतिकचे वडील हे मुंबईत नोकरी करतात. साप्ताहिक सुट्टीला ते घरी येतात. हृतिकचा अधिकाधिक वेळ हा मोबाइलवर जातो. त्यामुळं रविवारी त्याला पालक रागावले. यामुळं तो रागानं घरातून निघून गेला. बराच वेळ झाला तरी मुलगा परत आला नाही म्हणून त्यांनी त्याच्या मोबाइलवर फोन केला. पण त्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं पालकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जवळच असलेल्या शेडमध्ये छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसला. त्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. तेथे त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळं मानकर कुटुंबीयांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.