‘मोदींच्या रॅलीला न येणारे देशद्रोही असतील’, म्हणणाऱ्या भाजपा नेत्यानेच मारली ‘दांडी’
वादग्रस्त वक्तव्ये आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे नाते तसे जुनेच आहे. मात्र यावेळेस त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांचीच नाचक्की झाली आहे. तीन मार्च रोजी पाटण्यामध्ये झालेल्या एनडीएच्या संकल्प रॅलीसंदर्भात एक वक्तव्य केले होते. पंतप्रधान मोदींच्या संकल्प रॅलीला न येणारे लोक देशद्रोही असतील असं वक्तव्य त्यांनी या रॅलीच्या आधी केले होते. मात्र रविवारी (३ मार्च) रोजी झालेल्या संकल्प रॅलीला स्वत: गिरिराज सिंह उपस्थित राहिले नाही. त्यांनीच ट्विट करुन या संदर्भातील स्पष्टिकरण दिले आहे. सध्या त्यांचे आधीचे वक्तव्य आणि आत्ता ट्विटवरुन दिलेले अनुपस्थितीसंदर्भातील स्पष्टिकरण व्हायरल होताना दिसत आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तनुसार, ३ मार्चच्या रॅलीच्या आदल्या दिवशी गिरीराज यांनी रॅलीला जास्तीत जास्त समर्थकांनी उपस्थित रहावे असं सांगितले होते. ‘३ मार्चला पाटण्यातील गांधी मैदान येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या संकल्प रॅलीला जे येणार नाहीत ते देशद्रोही असतील. या रॅलीमधून कोण पाकिस्तानच्या बाजूने आणि कोण भारताच्या बाजूने हे सिद्ध होईल. जे भारताबरोबर असतील ते मोदींसोबत असतील. तर जे पाकिस्तानच्या बाजूने असतील ते या रॅलीला येणार नाही,’ असं मत गिरिराज यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्यावरुन जनता दल युनायटेड, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तिन्ही पक्षांनी गिरिराज यांच्यावर टिकाही केली होती.
मात्र वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वत: गिरिराज सिंहच पंतप्रधानांच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे. त्यांनी ट्विट करुन आपल्या अनुपस्थितीचे कारण दिले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘दोन दिवसापूर्वी नवादाहून पटण्याला येताना माझी तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्प रॅलीमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. मोठी रॅली आणि पंतप्रधानांनी दिलेले भाषण टिव्हीवरुन पाहिले. देशाच्या विकासासाठी आणि शत्रुचे डाव मोडून काढण्यासाठी जनता पुन्हा एकदा मोदींनाच पंतप्रधान बनवेल.’
गिरिराज यांच्या या ट्विटखाली अनेकांनी त्यांच्या रॅलीपूर्वीच्या वक्तव्याच्या बातमीचे फोटो रिप्लाय मधून पोस्ट केले आहेत.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी रविवारच्या संकल्प रॅलीमध्ये भाषण करताना ‘दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार आणि काळे पैश्याविरुद्ध कारवाई ही आपली प्राथमिक उद्दीष्टे आहेत. तर विरोधकांचे प्राथमिक उद्दीष्ट केवळ मोदींना हटवणे इतकेच आहे,’ अशी टिका विरोधकांवर केली होती. या रॅलीमध्ये मोदींनी मागील चार वर्षात त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.