राज ठाकरे यांची सभा संपताच इम्तियाज जलील यांची टीका, म्हणाले…
औरंगाबाद : “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात दिलेला अल्टीमेटम हा महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे, तो मुस्लिम समाजाला दिलेला नाही. त्यामुळे राज्याचं गृहखातं हाती असलेल्या दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष असेल”, असं एमआयएम खासदार इम्तियाज जलील म्हणाले. तर हिंदू मुस्लिम यांच्यातली दरी भरायला आली की कुणीतरी माशी जखमेवर बसते”, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर शरसंधान साधलं. “भाजपच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला. शिक्षण, आरोग्य, महागाई असे महत्त्वाचे विषय असताना राज ठाकरे समाजाला भरकटवत आहेत”, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमधल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक मैदानावर मोठ्या दिमाखात सभा पार पडली. या सभेत त्यांनी प्रामुख्याने शरद पवार, ठाकरे सरकार यांच्यावर हल्ला चढवला. तसंच भोंगाप्रकरणावर ठाम भूमिका घेत ४ तारखेच्या पुढे आम्ही भोंगा ऐकणार नाही, जर भोंगा ऐकायला आला तर डबल आवाजात हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंची सभा संपल्यानंतर इम्तियाज जलील यांनी लगोलग पत्रकार परिषद घेऊन मनसेच्या भूमिकेवर हल्ला चढविला.
भाजपच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला
“भाजपच्या सांगण्यावरुन राज ठाकरेंनी भोंग्याचा मुद्दा काढला. राज ठाकरे आपल्या भाषणात सांगत आहे की भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, हे मलाही मान्य आहे, मग अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची होती? २०१४ ते २०१९ पर्यंत भाजपचं सरकार सत्तेत होते, त्यावेळी राज ठाकरे का बोलले नाहीत? असा रोकडा सवालही जलील यांनी विचारला.
राज ठाकरेंसाठी खास शेर
महाराष्ट्राला द्वेषाची परंपरा नाही. आपल्याकडे प्रेमाचा वारसा आहे. राज ठाकरेंची भूमिका भाजपच्या सांगण्यावरुन आहे, हे वेगळं सांगायला नको, मला राज ठाकरेंच्या राजकारणावर एक शेर सुचतोय, तो असा… “सिसायत नफरतों के जखमों को भरने हीं नहीं देती , जब भी भरने आती हैं जख्म, वहाँ मख्खी बैठ जाती हैं…”, असं म्हणत हिंदू मुस्लिम यांच्यातली दरी भरायला आली की कुणीतरी माशी जखमेवर बसते, अशा शेलक्या शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
राज ठाकरेंचा अल्टीमेटम मुस्लिम समाजाला नाही तर महाराष्ट्र सरकारला आहे. आमचं लक्ष महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेकडे आहे. मी मुस्लिम समाजाला विनंती करतो की आपण राज ठाकरेंच्या भाषणावर व्यक्त होऊ नका. कारण महाराष्ट्राला द्वेषाची परंपरा नाही. आपल्याकडे प्रेमाचा वारसा आहे, असंही जलील म्हणाले.