मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, उपचाराची गरज – भूपेश बघेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद भारतीय राजकारणात उमटताना दिसत आहेत. काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांकडून मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना उपचाराची गरज आहे अशी टीका केली आहे.
सोमवारी रायपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना बघेल म्हणाले, ‘राजीव गांधीबाबतचं मोदींनी केलेलं विधान निंदनीय आहे, त्यांनी देशाची माफी मागायला हवी. राजीव गांधींनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिलं. मोदींनी सांगितलं होतं की ते केवळ 3 ते 4 तास झोप घेतात. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचं मानसिक संतुलन लवकर बिघडतं, त्यांना उपचाराची गरज आहे’.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदींच्या वक्तव्यावर, ‘स्व. राजीव गांधींबद्दलच्या विधानासाठी मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही’ अशी टीका फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.
काय म्हणाले होते मोदी –
‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही’ असं विधान मोदींनी केलं होतं.
राहुल गांधींचं प्रत्युत्तर –
‘मोदीजी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही’ असं प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिलं आहे.