“मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला गेला नाही” – उद्धव ठाकरे
‘मुस्लिम आरक्षणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारपुढं आलेला नाही. त्यामुळं त्यावर निर्णय होण्याचा प्रश्न नाही. तो प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर विचार होईल. त्यामुळं विरोधकांनी उगाचच त्यावरून आदळआपट करू नये,’ अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांना सरकारच्या निर्णयाशी संबंधित अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. मुस्लिम आरक्षणाबाबत मागील आठवड्यात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली होती.
राज्य सरकार मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण देणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर कायदा करण्यात येईल, असं मलिक यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव आमच्यापुढं नाही. तोपर्यंत विरोधकांनी आदळआपट करण्याची गरज नाही. ही एनर्जी मुद्दा आल्यावर वापरण्यासाठी जपून ठेवा.’