मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर झालाच नाही: चंद्रकांत पाटील
मुंबई । प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा वापर अद्याप करण्यात नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे.
पीएम केअर फंडमुळे देशभरातील अनेक लोकांना आधार मिळाला. एकीकडे पीएम केअर फंडच्या माध्यमातून लोकांना सतत मदत केली जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’चा अद्यापही वापर झाला, नसल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील 550 कोटी पैकी फक्त 132 कोटीच आतापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. ही मदत देखील फक्त स्थलांतरित मजुरांनाच केली गेली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
आज जेथे राज्यात नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि अनेक शहरांमध्ये नागरिक कोरोनाच्या युद्धात लढताना कमजोर पडत आहेत. कारण त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. दुसरीकडे राज्यभरात गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही शासनाने या रक्कमेचा रुग्णांसाठी तसेच इतर सुविधा पुरवण्यासाठी वापर का केला नाही? ज्याठिकाणी जास्त गरज आहे, तिथे एक दमडीसुद्धा या साहाय्यता निधीमधून देण्यात आली नाही, जी फार लज्जास्पद बाब असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.