मुंबई , ठाणे , नवी मुंबई येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याच्या मागे घातापातची शक्यता; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला संशय
मुंबई , ठाणे , नवी मुंबई येथील वीज पुरवठा सोमवारी बऱ्याच काळासाठी खंडित करण्यात आला होता. यावर महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घातापातची शक्यता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. “सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुंबई सह ठाणे, नवी मुंबई परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी चर्चा करुन चौकशीचे आदेश दिले होते.
वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटले होते. तसंच तासाभरात वीज पूरवठा पूर्ववत होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला होता. मात्र काही भागात वीज पुरवठा पूर्ववत होण्यास बराच काळ लागला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने पश्चिम, मध्य रेल्वेसेवेवर देखील परिणाम झाला. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षा देखील रद्द कराव्या लागल्या आहेत.
मनी कंट्रोलने दिलेल्या रिपोर्टनुसार, 12 ऑक्टोबर रोजी मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये 2,600 MW इतक्या वीज पुरवठ्याची मागणी झाली होती. त्यावेळेला मुंबई मध्ये वीज पुरवठा करणाऱ्या 4 ट्रान्समिशन्स लाईन्सपैकी तिसरी ट्रान्समिशन लाईन ट्रिप होवून शट डाऊन झाली. यामुळे 4 ही लाईन्स शट डाऊन करुन समस्येवर तोडगा काढण्यात आला आणि त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.