मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिक कोरोनाचं नेक्स्ट डेस्टिनेशन
मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिक कोरोनाचं नेक्स्ट डेस्टिनेशन होत असल्याची भीती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.भारतीय जैन संघटना, शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन नाशिक झिरो’ या उपक्रमाचं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते. जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असं सांगतानाच मुंबई-पुण्यानंतर आता नाशिक कोरोनच नेक्स्ट डेस्टिनेशन होत असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आता दृढनिश्चयाने प्रयत्न करावे लागतील, असं ते म्हणाले.
हे काम जबाबदारी आणि कष्टाने करावे लागणार आहे. कोरोना कोणाची जात बघत नाही. आपण मनुष्य आहोत याचा विचार करून जे मापदंड हा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित करून देण्यात आले आहेत, त्याचे पालन करण्याची गरज आहे. कोरोनाच्या काळात करोना हाच आपल्या सर्वांचा प्रतिपक्ष असून आपल्या सर्वांना करोनविरुद्ध एकत्र येऊन लढाई जिंकायची आहे. करोनाला घाबरून त्याचा सामना जग करू शकत नाही. ही लढाई एकप्रकारची माणूसकीविरूद्धची लढाई समजूनच प्रत्येकाने त्याचा सामना करावयाचा आहे. सामाज माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत अधिकाधिक माहिती पोहचवून मदत करण्याची गरज असून केवळ शासन आणि महापालिका यात यशस्वी होवू शकत नाही, त्यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत घेऊन लोकसहभागातून आपण यावर मात करू शकतो, असंही ते म्हणाले.
राज्याच्या तुलनेत नाशिकमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक रुग्ण शोधता आले आहेत. त्यातून रुग्ण जरी वाढत असले तरी त्यासाठी भरीव उपाययोजनाही करण्यात येत आहेत. सामाजिक सहभागातून कोरोनावर मात करण्यासाठी विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून ‘मिशन नाशिक झिरो’ राबविण्यात येत आहे. त्यावर पूर्णपणे नियंत्रण भारतीय जैन संघटना करणार असून फिरते दवाखाने कंटेंटमेंट झोनमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.