मुंबईमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढणार : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
मुंबई | भारतात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या जवळ पोहचत असताना महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर होत आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 4 हजार 669 रुग्ण आहेत. यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. दरम्यान, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पाच सदस्यीय टीमने असा अंदाज वर्तवला आहे की, मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42 हजार 604 कोरोना प्रकरणांची नोंद होईल. तर, हा आकडा 15 मेपर्यंत 6 लाख 56 हजार 407वर जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची गणिती मॉडेलिंगच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरुवातीला एकत्र केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 13 हजार 636 व्हेंटिलेटर आणि 4 लाख 83 हजार आयसोलेशन बेडचा अभाव असेल. त्यामुळे येत्या काळात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढल्यास राज्य सरकारपुढे मोठ्या समस्या असण्याची शक्यता आहे.