मुंबईत पावासाचा प्रमाण चांगल; मात्र तलावांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 50% पेक्षा कमी पाणीसाठा
महाराष्ट्रामध्ये यंदा चांगला पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. दरम्यान मुंबई सह महाराष्ट्राच्या इतर भागात मागील काही दिवसांत अधून मधून जोरदार सरी बरसत आहेत. मात्र धरणक्षेत्र आणि तलावांमध्ये अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने थोडी चिंता वर्तवण्यात येत आहे. यंदा मुंबईच्या तलावांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 50% पेक्षा कमी पाणीसाठा असल्याचं म्हटलं जात आहे.मात्र अद्याप मुंबई महानगरपालिकेने शहरात पाणीकपातीचा निर्णय जाहीर केलेला नाही.
21 जुलै पर्यंत मुंबईच्या तलावांमध्ये 4 लाख मिलियन लीटरपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. हा साठा अंदाजे 28% गरज भागवू शकतो. मागील वर्षी याच काळात हा साठा 7.6 लाख मिलियन लीटर इतका होता. त्यावेळेस तो गरजेच्या 52% इतका होता. तुलसी लेक हा मुंबईला पाणीपुरवठा करणारा लहान तलाव देखील अद्याप यावर्षी भरलेला नाही.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जवळच्या काही दिवसात फार जोरदार पावसाची शक्यता देखील धुसर आहे. समुद्र किनारी ढग निर्माण होतात ते उपनगरांमध्ये कोसळतात. मात्र धरण क्षेत्र, तलाव क्षेत्रात पोहचण्यापूर्वीच संपत आहेत. त्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे.
दरम्यान जुलै महिन्याच्या सरासरीचा पाऊस बरसला आहे. मात्र तरीही पाणीसाठा पुरेसा नसल्याने आता पालिका प्रशासन देखील या बाबत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुंबईप्र्माणे पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये स्थिती बिकट आहे. सध्या कोरोना संकटकाळात हात- पात वारंवार धुण्याचं आवाहन केले जात आहे. भाज्या, फळं देखील खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन सुकवून खाण्याचं आवाहन केले जात आहे. मात्र यामध्येच आता पाणी सांभाळून वापरण्याची गरज असल्याचं देखील सांगितलं जात आहे.