मुंबईत कोरोना नियंत्रणाला यश, रुग्ण दुपट्टीचा कालावधी वाढला
मुंबई – मुंबईसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता रुग्ण दुपट्टीचा कालाधी १५७ दिवस झाला आहे. १० दिवसांपूर्वी हाच कालावधी १०० होती. अवघ्या १० दिवसांत ५७ दिवसांचा कालावधी झाल्याने कोरोनावरील उपाय यशस्वी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
गेल्या दोन महिन्यात गणेशोत्सव मग दसरा आदी सण आल्याने बाजारापेठांमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. परिणामी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. मात्र बाधित आणि संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण, विलगीकरणात ठेवल्यानंतर संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण येऊ लागले आहे. रुग्णसंख्या कमी होऊ लागताच रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढू लागला आहे. दहा दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने सरासरी शंभर दिवसांचा टप्पा गाठला होता. आता त्यात ५७ दिवसांची वाढ झाली असून हा कालावधी सरासरी १५७ दिवस झाला आहे.
विशेष म्हणजे परळ परिसर (एफ-दक्षिण विभाग) रुग्ण दुप्पटीचा कालावधीचा २०० दिवसांचा टप्पा ओलांडणारा पहिला विभाग ठरला होता. आजघडीला या भागातील रुग्ण दुप्पटीचा कालावधी ३६२ दिवसांवर पोहोचला आहे. यापाठोपाठ सॅण्डहर्स्ट रोड (बी), एल्फिन्स्टन (जी-दक्षिण), कुलाबा (ए) या विभागांनीही रुग्ण दुप्पटीत २०० दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या या विभागांमध्ये रुग्ण दुप्पटीचा काळ अनुक्रमे २३२, २३१ व २१२ दिवस असा आहे.