मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचा मुंबई महापालिकेचा दावा
मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. गेल्या आठवड्याभरात शहर-उपनगरात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख चढता असल्याचे दिसून येते आहे. शिवाय, मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येतही 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आलंय. मात्र, कोरोना चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.
मे आणि जून महिन्यात रोज सरासरी 4 हजार, जुलै महिन्यात रोज सरासरी 6500, ऑगस्ट महिन्यात रोज 7619 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सप्टेंबर महिन्यात रोज 9 ते 10 हजारकोरोना चाचण्या मुंबईत केल्या जात आहेत.
रविवारी 6 सप्टेंबरला 11,861 चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांची संख्या रोज 10 हजार ते 14 हजारांवर नेली जाणार आहे. यामुळे 1000 ते 1300 दरम्यान वाढत असलेली रुग्णसंख्या आता 1700 ते 2000 दरम्यान वाढत आहे. यामध्ये रॅपिड टेस्टची संख्या धरण्यात आलेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दरम्यान मुंबईत येत्या तीन दिवसांत 250 आयसीयू बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे रोज 350 आयसीयू बेड्स रिकामे राहतील , अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली. सध्या 4800 बेड्स मुंबईत रिकामे असून येत्या काही दिवसांत जम्बो फॅसिलिटी सेंटरमध्ये आणखी 6200 बेड्स वाढवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरु नये, असं आवाहन देखील मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.