मुंबईच्या डबेवाल्यांची आर्थिक कोंडी; केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई | करोनाच्या पार्श्वभूमीवर १९ मार्चपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजगार नसल्यामुळं डबेवाल्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर डबेवाल्यांनी केंद्र सरकारकडे अनुदानाची मागणी केली आहे.
राज्यात अनलॉक सुरू झाल्यापासून टप्प्याटप्प्याने सर्व क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. एसटी वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, मुंबईतील लोकल बंद आहेत. त्याचा मोठा फटका डबेवाल्यांना बसला आहे. विविध कार्यालयांत डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचे प्रवासाचे माध्यम हे लोकल ट्रेन आहे. मात्र ती बंद असल्यामुळं त्यांचा व्यवसाय ठप्प आहे.
मुंबई हळूहळू पू्र्वपदावर येत आहे. शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत. या कार्यालयांमध्ये चाकरमानी कामावर रूजू होऊ लागले आहेत. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहोचवण्याची मागणी करत आहेत. पण लोकलसेवा सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाल्यांचा नाइलाज आहे.
‘लोकल ही जशी मुंबईची लाइफलाइन आहे, तशीच ती डबेवाल्यांचीही लाइफलाइन आहे. ती सुरू होत नाही तोपर्यंत डबेवाल्यांना आपली सेवा
देणे शक्य नाही,’ असं असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं.