माझ्या जीविताला धोका वाढलाय काय? – भारत पाटणकर
सांगली – ‘तुमची नियुक्ती माझ्या संरक्षणासाठी केली आहे, मी काय बोलतो ते ऐकण्यासाठी नाही.’, ‘पोलिसांची संख्या आज वाढली आहे. माझ्या जीविताला धोका वाढला आहे काय? ,’ असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पोलिसांना सुनावले. सांगलीत पत्रकार परिषदेवेळी पोलिसांच्या हालचालींवरून डॉ. पाटणकर यांनी त्रागा केला.
डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर इतरही काही विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना धमक्यांची निनावी पत्रे येऊ लागली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. पाटणकर यांनाही वारंवार धमकीचे निनावी पत्र येत होते. त्यावरून डॉ. पाटणकर यांना पोलिस संरक्षण दिलेले आहे. कासेगाव येथील 197 कुटुंबांच्या घरांची जागा विनाशुल्क नियमित करण्यासाठीचे आंदोलन व त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावाबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यासाठी डॉ. पाटणकर शुक्रवारी सांगलीत आले होते. पत्रकार परिषद सुरू असलेल्या खोलीत पोेलिस आल्याचे पाहून डॉ. पाटणकर संतापले. ‘तुमची नियुक्ती माझ्या संरक्षणासाठी केली आहे, मी काय बोलतो ते ऐकण्यासाठी नाही’, असे डॉ. पाटणकर यांनी सुनावले. दरम्यान काही वेळेनंतर आणखी एक पोलिस पत्रकार परिषद सुरू असलेल्या खोलीत आले. ते पाहून त्यांचा राग वाढला. ‘पाोलिसांची संख्या आज वाढली आहे. माझ्या जिविताला धोका वाढलाय का?’, असे डॉ. पाटणकर यांनी संतापाने सुनावले.