महाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षण मंत्र्यांचा निर्णय
मुंबई – “महाराष्ट्रात प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच घेतला जाणार”, अशी माहिती आता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे, राज्यात प्रत्यक्ष शाळा सुरू होण्यास आता नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. “राज्यातील संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, आता दिवाळीनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल”, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे. “दिवाळी १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान असून तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरुच राहील”, असेही जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने खरंतर २१ सप्टेंबरपासूनच ९ वी ते १२ वीपर्यंतच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, किमान महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी प्रत्यक्ष शाळा सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रात देखील २१ सप्टेंबरपासून शाळा सुरु करता येतील का ? याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून शुक्रवारी (११ सप्टेंबर) संस्थाचालक महामंडळाची ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रातील कोरोनास्थिती लक्षात घेता सध्या तरी राज्यातील शाळा प्रत्यक्ष उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी बैठकीत घेतल्याचे समजते.