महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 63 वर पोहचला
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ६३ वर पोहचला आहे. २४ तासांमध्ये ११ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामधील १० रुग्ण हे मुंबईचे तर एक रुग्ण पुण्याचा आहे. ११ कोरोनाबाधितांमध्ये ८ जण हे परदेशातून आलेले आहेत. तर त्यांच्या संसर्गामुळे इतर तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसंच, राज्यातील ६३ कोरोनाबाधितांमध्ये १३ ते १४ जणांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. आपल्या देशात हा विषाणू नव्हता. तो रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, असे राजेश टोपेंनी सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी यंत्रणा वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. रुग्णालयात बेड वाढवण्यात येणार आहे. आपत्कालीन शस्त्रक्रिया नसतील तर त्या पुढे ढकला असे डॉक्टरांना सांगण्यात आले आहे जेणे करुन कोरोनाबाधितांना बेड मिळू शकतील.’ तसंच, राज्यामध्ये लॅब वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्या ७ टेस्टिंग लॅब आहेत ही संख्या १२ ते १५ पर्यंत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवरुन राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. त्यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसंच, कोरोनामुळे मुंबई, पुण्यामध्ये काम करणारे कामगार, मजूर आणि विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले आहेत. रात्री उशिरापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होती. या प्रवाशांसाठी जास्त रेल्वे गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन ते सुरक्षित आपल्या गावी जातील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.