महाराष्ट्राचे वीरपुत्र यश देशमुख काश्मिरात शहीद
जळगाव – संपूर्ण जग कोरोनाशी झुंज देत असताना भारताच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहे. काश्मीरमधील श्रीनगर येथे गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. प्रशिक्षण झाल्यानंतर गेल्या सात महिन्यापूर्वी त्यांची पहिलीच पोस्टींग श्रीनगरला झाली होती. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१व्या वर्षी आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात झाला. दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर बेछूट गोळीबार केला. रहदारीचा भाग असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचू नये यासाठी लष्कराच्या जवानांनी कारवाईदरम्यान संयम बाळगला. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोन जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख लष्करात रुजू झाले होते. त्यांचे पार्थिव २८ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव येथे आणले जाणार आहे.
दरम्यान, यश यांच्या मृत्यूची बातमी मिळताच त्यांच्या आईला धक्का बसला व त्या बेशुद्ध झाल्या. तर यश यांचे वडील शेतकरी असून, लहान भावाचे बारावीचे शिक्षण झाले आहे. यश हे सतत आई-वडिलांना फोन करून खुशाली विचारायचे. गावातले मित्र, शेजारी व परिचितांनाही फोन करून चौकशी करायचे. दोनच दिवसांपूर्वीच त्यांनी घरी फोन करून तब्येतीची विचारपूस केली होती. हा त्यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संवाद होता.