मला नको मात्र काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्याला नोबेल द्या: इम्रान खान
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना मायदेशात पाठवल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा अशी मागणी जोर धरला आहे. शनिवारी पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यानंतर आता स्वतः इम्रान खान यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही, पण काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा’ असं इम्रान खान म्हणाले आहेत. ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देताना, ‘मी नोबेल पुरस्कारासाठी पात्र नाही. काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर मुद्दा सोडवणाऱ्या व्यक्तीला नोबेल पुरस्कार द्यायला हवा. या मुद्द्यावर तोडगा निघाल्यास या क्षेत्रात शांतता नांदेल आणि विकास होईल’, असं त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे, काल(दि.4) पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. अनेक नेटकऱ्यांनी हा प्रकार बालिशपणा असल्याचं म्हटलं, तर डॉ. कुमार विश्वास यांनी ‘ऑस्कर का नाही देत’ असा खोचक प्रश्न ट्विटरद्वारे विचारला आहे. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच पसंतीस उतरत आहे.