मराठी राजभाषा होण्यासाठी नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता स्वागत करा – हेमंत टकले
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात मराठी भाषा अधिकाधिक वापरात असावी, ती ज्ञानभाषा… व्यवहार… विज्ञान…आणि संस्कृतीची भाषा व्हावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या निर्णयाकडे नकारात्मक दृष्टी न ठेवता त्याचे स्वागत केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केले आहे.
मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पुढील अर्थसंकल्पात ठोस निर्णय घेणार असल्याचे आमदार हेमंत टकले म्हणाले.
मराठी भाषेच्या माध्यमातून स्वत:चे जीवन समृद्ध करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. जेणेकरून अनेक विषयांना चालना मिळेल व आपण परिवर्तनाकडे निश्चित जाऊ, असा विश्वास आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार रंगभवन येथे मराठी भाषा भवन उभारणार आहे शिवाय मंत्रालयामध्ये मराठी भाषेसाठी पूर्णपणे काम करणारा विभाग उभारणार आहे. ही मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.त्यामुळे सर्वांनी आपापल्यापरीने मराठी भाषेसाठी योगदान द्यावे असे आवाहनही आमदार हेमंत टकले यांनी केले आहे.
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासाचा… सांस्कृतिक… सामाजिक जडणघडणीचा पाया रचला होता. तेव्हापासून मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला. परंतु आज ६० वर्षांनंतरही इतर भाषांचा प्रभाव आपल्या राज्यातील व्यवहाराच्या सर्व पातळीवर आणि शिक्षणाच्या सर्व स्तरांवर अधिक जाणवतो असल्याची खंतही आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.