मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
मुंबई | महाईन्यूज
मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र दिले आहे. आपण स्वतः लक्ष घालून यावर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.
पत्रात लिहिले आहे की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तज्ञांची समिती स्थापन नेमली. समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर केला. मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी निकष पूर्ण करते.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत पाठपुरावा करुनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. या विभागाने हे प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे असल्याचं कळवलं आहे. बऱ्याच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी मोदींकडे केली आहे.