मनसे नेते अविनाश जाधव यांचा जामिन अर्ज फेटाळला
ठाणे – परिचारिकांसाठी वसई महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यांना दोन दिवसांचटी कोठडी सुनावण्यात आली. तसेच, ठाण्यातील न्यायालयाने अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्यानं, मनसे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परिचारिकांच्या वेतनासाठी अविनाश जाधव यांनी वसई-विरार महापालिकेत आंदोलन केलं होतं. त्यामुळे त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीमध्ये मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यातून हद्दपार होण्यास सांगितलं आहे. लोकांच्या हितासाठी आंदोलन करत असल्यामुळं राज्य सरकारनं बक्षीस दिल्याचं जाधव यांनी म्हटलं होतं. तसेच, विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालानं जाधव यांना ४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.
त्यानंतर, अविनाश जाधव यांच्यावर ३५३ कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे अविनाश जाधव यांना न्यायलयीन कोठडी मिळाली असून त्यांची रवानगी तळोजाला करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून ६ ऑगस्टला याबाबत सुनावणी होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
या सगळ्या घडामोडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंच्या सूचनेनुसार, नांदगावकर यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. तसंच, अविनाश जाधव यांना निरोपही पाठवला. ‘अविनाश, मै हू ना’ अशा शब्दांत राज यांनी जाधव यांना धीर दिला.