मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन २६ मार्चपर्यंत स्थगित
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर गोंधळातच मध्य प्रदेशच विधानसभेचे कामकाज २६ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या निर्णयानंतरही विरोधी बाकांवरील सदस्य सभागृहातच बसून राहिले.
मध्य प्रदेशमधील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. राज्यातील काँग्रेसचे सरकार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार का, असा प्रश्न होता. काँग्रेसच्या २२ आमदारांनी आपले राजीनामे राज्यपालांकडे पाठवून दिले आहेत. त्यामुळे राज्यपाल लालजी टंडन यांनी आपले अभिभाषण झाल्यावर कमलनाथ यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले.
राज्यपाल म्हणाले, सर्वांनी घटनेतील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशचा सन्मान जपला जाईल. यानंतर त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सरकारला दिले.मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या २२ आमदारांनी आपले राजीनामे दिले. विधानसभेचे अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी सर्वांचे राजीनामे मंजूर केलेले नाहीत. त्यांनी काही निवडक आमदारांचे राजीनामेच मंजूर केले आहेत. २२ आमदारांपैकी फक्त सहा जणांचे राजीनामेच मंजूर करण्यात आले आहेत.