मध्य प्रदेशातील शापित गाव ; 400 वर्षात स्त्रीची प्रसूती नाही
राजगढ (मध्य प्रदेश)- राजगढमधील सांक्य श्यामजी गावात गेल्या 400 वर्षात कोणाही स्त्रीची प्रसूती झालेली नाही. एकही मूल जन्माला आलेले नाही. जर गावात एखाद्या स्त्रीच्या प्रसूतीचा प्रसंग आलाच, तर एक तर माता, मूल दगावते वा त्यांच्यात काही तरी व्यंग तरी निर्माण झालेले असते, असे ग्रामस्थ सांगतात. राजधानी भोपाळपासून सुमारे 130 किमी अंतरावर आहे हे सांक्य श्यामजी गाव. या गावात कोणाही स्त्रीची प्रसूती होऊ दिली जात नाही. त्यासाठी काही लिखित कायदे कानून नाही; पण गावातील 90 टक्के स्त्रियांची प्रसूती गावाबाहेरच होते. एक तर हॉस्पिटलमध्ये, वा गावाबाहेर बांधण्यात आलेल्या एका खास खोलीमध्ये. बाळ आणि बाळंतीण यांच्या भल्यासाठी त्यांनी गावाबाहेर जावे असे गावकरी सांगतात.
गावातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांची प्रसूती ही हॉस्पिटल्समध्ये आणि अगदीच इमरजन्सी असेल तर गावाबाहेर खास बांधण्यात आलेल्या खोलीमध्ये केली जाते, असे गावचे सरपंच नरेंद्र गुर्जर यांनी सांगितले. अगदी पावसाळ्यात आणि खराब वातावरणातही प्रसूतीसाठी गावाबाहेर नेण्याच्या प्रथेत खंड पडत नाही. फार पूर्वी एका स्त्रीने मंदिराच्या बांधकामात अडथळा आणला होता, तेव्हापासून गाव या शापाने बाधित झालेले आहे आणि प्रत्येकाचा या शापावर विश्वास आहे. असे सरपंचांनी सांगितले आहे.