मतांचा जोगवा मागण्यासाठी राज ठाकरेंना छत्रपतींच्या राजमुद्रेचा आधार घ्यावा लागला – संभाजी ब्रिगेड
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच्या झेंड्याचे आज अनावरण करण्यात आले. झेंडयावर वापरलेल्या राजमुद्रेवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. अत्यंत कडव्या शैलीत संभाजी ब्रिगेडने मनसेचा समाचार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. त्यांनी लोकांचे कल्याण साधणारे स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य चालवण्यायाठी त्यांनी राजमुद्रेची निर्मिती केली. राजमुद्रा ही प्रशासकीय बाब आहे. महाराजांच्या काळात जोपर्यंत राजमुद्रा पत्रावर उमटत नव्हती, किंवा राजमुद्रेचा शिक्का मारला जात नव्हता, तोपर्यंत तो व्यवहार अधिकृत मानला जात नव्हता. इतकी ताकत त्या राजमुद्रेमध्ये आहे. असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
मनसेने आज त्यांच्या पक्षीय भगव्या झेंडयावर राजमुद्रा उमटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा खून केला आहे. हा शिवद्रोह आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी जातीचे रंग बाजूला ठेऊन १४ वर्षात राजकीय जहाज बुडाल्यानंतर राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमुद्रेचा आधार घ्यावा लागला, अशा शब्दांत संतोष शिंदे यांनी मनसेचा समाचार घेतला आहे.
आमचा विरोध केवळ राजमुद्रेला
मनसेने नव्याने अनावरण केलेल्या भगव्या झेंडयाला विरोध नाही. त्यावर वापरलेल्या राजमुद्रेला आमचा विरोध आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेडने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजमुद्रा वापरता येणार नाही, असा कायदा असताना राजमुद्रा वापरली जातेय. त्यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतोष शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ लक्ष घालून कायदेशीर कारवाई करावी. मनसेने झेंडयावरुन राजमुद्रा हटवली नाही तर, संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुन आपल्या स्टाइलने आंदोलन करेल, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |