मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची तयारी सुरू, सरकार कायदा करणार
मुंबई |महाईन्यूज|
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या विषयावरून देशभरात सुरू असलेला गदारोळ अजून संपलेला नसतानाच आता केंद्र सरकार प्रत्येकाचे आधार कार्ड त्याच्या मतदार ओळखपत्राशी जोडण्याचा निर्णय घेणार आहे. आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी जोडणे बंधनकारक करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून आलेला अहवाल बघून पुढील निर्णय घेण्याचे ठरविले आहे. हा विषय मंजुरीसाठी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकप्रतिनिधीत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाकडून काम सुरू करण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यावर या संदर्भातील विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडले जाईल. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यावर हे विधेयक संसदेपुढे मंजुरीसाठी ठेवले जाईल.
लोकप्रतिनिधीत्व कायद्यात सुधारणा केल्यावर नागरिकांना आपले मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणे आवश्यक होणार आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने अशा स्वरुपाचा निर्णय घेतला तर कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती, डेटा याची चोरी केली जाणार नाही ना, याचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच हे विधेयक मांडले जाईल, अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.