बिहार मध्ये नितीशकुमार हाच एनडीएचा चेहरा
- जेडीयुची भूमिका भाजपसाठी आव्हानात्मक
पाटणा – एनडीए आघाडीत आता रोज नवीन समस्या उद्भवू लागली आहे. तेलगु देसम आणि शिवसेना या पक्षांनी अधिकृतपणे एनडीएची साथ सोडण्याची भूमिका घेतल्यानंतर या आघाडीतील जेडीयु पक्षानेही आता आपला फणा काढल्याचे चित्र आहे. जेडीयु म्हणजेच संयुक्त जनता दलाच्या कोअर कमिटीची रविवारी पाटण्यात बैठक झाली त्यात मुख्यमंत्री नितीशकुमार हेच एनडीएचे बिहार मधील चेहरा असतील अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका भाजपसाठी आव्हानात्मक ठरली आहे.
जेडीयु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले नितीशकुमार यांच्या पाटण्यातील अधिकृत निवासस्थानीच ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीसाठी धोरण ठरवण्यासाठी जेडीयु-भाजप यांची एक संयुक्त बैठक येत्या 7 जूनला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जेडीयु पक्षाने आपल्या कोअर कमिटीची बैठक घेऊन ही भूमिका घेतली आहे. बिहार विधानसभेत जेडीयुचे 70 आमदार आहेत आणि भाजपचे 50 आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या जागा वाटपात जादा जागा मिळवण्यासाठीची ही स्ट्रॅटेजी जेडीयुने घेतली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यात 40 पैकी 22 जागा जिंकल्या होत्या त्या आधारावर जागा वाटपात वर्चस्व गाजवण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठीच जेडीयुने ही भूमिका घेतली असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. नुकत्याच झालेल्या विविध राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्ये एनडीएची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने एनडीएच्या घटक पक्षांनी भाजपने आपली वर्चस्ववादी भूमिका सोडावी अशी आग्रही मागणी घटक पक्षांकडून सातत्याने केली जात आहे.