मंत्र्यांच्याही घरात वाजावी बासरी म्हणजे भांडणतंटे दूर होतील: हरिप्रसाद चौरासिया
महाईन्यूज | पुणे
‘‘बासरी की सुरोंसे लडाई-झगडे बंद होते है; बासरी की संगीत ऐसा है जिससे सब माहौल प्रसन्न हो जाता है,’’ असा विचार ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी व्यक्त केलेले आहे. ‘‘बासरी ही प्रत्येक मंत्र्यांच्याही घरात वाजली पाहिजे. म्हणजे भांडणतंटे दूर होऊन ‘हार्मनी’ निर्माण होईल,’’ अशीही टिप्पणी त्यांनी केली तेव्हा एकच हशा पिकला होता. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे ६७ वा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवारी (ता. ११) सुुरु झाला. याच महोत्सवाचा भाग असलेल्या ‘षड्ज’ या शास्त्रीय संगीत महोत्सवास तसेच ‘अंतरंग’ या कार्यक्रमालाही प्रारंभ झाला होता.
यात प्रख्यात गायक अमरेंद्र धनेश्वर यांनी पं. चौरासिया यांच्याशी संवाद साधला होता. त्यांच्या मिश्किल स्वभावाचे दर्शन या मुलाखतीदरम्यान घडले.बासरी हे संगीतातले पहिले वाद्य आहे, अशी सुरुवात करुन पं. चौरासिया म्हणाले, पंडित पन्नालाल घोष यांना ऐकण्याची संधी मला मिळाली आहे. ते शास्त्रीय वाजवायचे. पण तत्कालीन शास्त्रीय संगीतकारांनी बासरीला पहिल्यांदा फार महत्त्व दिले नव्हते. बासरीची उपेक्षाच करण्यात आली. आता मात्र भजन, गझल, लोकधून, शास्त्रीय संगीत असा बासरीचा सर्वदूर संचार आहे. बासरी हे असे वाद्य आहे ज्यातून योगही साधला जातो, असे ते म्हणाले.