भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या घरावर गोळीबार, तिघांचा मृत्यू
जळगाव : जळगावमधील भुसावळ येथे नगरसेवक रविंद्र उर्फ हंप्या खरात यांच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या बेछुट गोळीबारात खरात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.
नगरसेवक रविंद्र खरात यांच्या कुटुंबावरील या हल्ल्याने जळगावमधील पोलीस यंत्रणेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्यानेच त्यांची थेट कुटुंबावर गोळीबार करण्याची मजल गेल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप गुन्हेगारांबाबत काहीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येईल, असं सांगितलं. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय आहे याबाबतही कोणतीही माहिती नाही. हा हल्ला नेमका वैयक्तिक वादातून होता की यामागे इतर काही राजकीय, व्यावसायिक कारणे होती हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.