भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारे ‘पुष्पक विमान’
आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या मित्राची सर नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झी स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट ‘पुष्पक विमान’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाची कथा आहे विष्णुदास वाणी म्हणजेच तात्यांची. तात्या जळगावमध्ये राहणारे वयाची ८३ गाठलेले व्यक्तिमत्व. कीर्तन, भजन आणि शेती यात आयुष्य वेचलेल्या तात्यांना तुकाराम महाराजांची वैकुंठ गमन ही कथा नेहमीच भुरळ घालत असे. हेच तात्या आपल्या एकुलत्या एक नातवाच्या म्हणजेच विलासच्या आग्रहाखातर जेव्हा मुंबई गाठतात तेव्हा मुंबईतील घुसमट त्यांना सहन होत नाही. कधी एकदा मुंबई सोडतो असे झालेले असताना, तात्या पहिल्यांदा अगदी जवळून उडणारे विमान पाहून भारावून जातात. आयुष्यभर कीर्तनातून ‘तुकाराम महाराजांचा पुष्पक प्रवास’ आनंदाने सांगणाऱ्या तात्यांसाठी ही घटना कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या इरसाल पण निरागस विश्वात कल्लोळ माजतो. भावनिक गुंतागुंतीच्या छटेला स्पर्शून जाणारी एक गाथा म्हणजेच ‘पुष्पक विमान’.