भारत-द. आफ्रिका क्रिकेट मालिका : अखेरच्या लढतीत भारतीय महिला संघाचा दारुण पराभव
- दक्षिण आफ्रिकेचा १०५ धावांनी विजय; मालिकेवर मात्र यजमानांचे ३-१ असे वर्चस्व
सुरत : फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाला शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहाव्या ट्वेन्टी-२० सामन्यात १०५ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु या पराभवानंतरही भारताने मालिकेत ३-१ असे यश संपादन केले.
कारकीर्दीतील १००वा ट्वेन्टी-२० सामना खेळणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला आफ्रिकेने १७.३ षटकांत अवघ्या ७० धावांत गुंडाळले. आफ्रिकेची सलामीवीर लिझेल ली सामनावीर, तर मालिकेत अष्टपैलू कामगिरी करणारी दीप्ती शर्मा मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. उभय संघांतील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला ९ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ली (८४) आणि सुन लुस (६२) या सलामीवीरांनी पहिल्या गडय़ासाठी १४४ धावांची भागीदारी रचून आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला. त्यामुळे आफ्रिकेने २० षटकांत ३ बाद १७५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.