भारतीय लष्कराला मिऴणार स्वदेशी दारूगोळा
- रु.15 हजार कोटीची तरतूद
नवी दिल्ली – दीर्घ काळाच्या वाटाघाटींनंतर भारतीय लष्कराने आपली शस्त्रास्त्रे आणि रणगाडे यांच्यासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याची स्वदेशातच निर्मिती करण्यासाठीच्या एका परीयोजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. रु 15 हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेमुळे दारूगोळा आयात करण्यात जाणारा वेळ अधिक आणि आणि त्यामुळे दारूगोळ्याचा साठा कमी होण्याची चिंता दूर होणार आहे.
दारूगोळ्याचा साठा वेगाने कमी होण्याची चिंता गेले अनेक वर्षे लष्कराला सतावत आहे. ही गंभीर समस्या दूर करण्यासाठीचा पहिला प्रयत्न अशा दृष्टीने या कडे पाहिले पाहिजे. शिवाय ज्या वेगाने चीन आपली लष्करी क्षमता वाढवत आहे, त्याचाही सामना करणे आवश्यक बनले आहे. या योजनेत 11 खासगी कंपन्यांचा समावेश करण्यात येणार आहे. 30 दिवसांच्या युद्धासाठी पुरेसा होईल इतका
दारूगोळ्याचा साठा सतत सज्ज ठेवणे आणि दारूगोळ्याच्या आयातीवरील निर्भरता कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे यासाठी आगामी दहा वर्षांचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या अंतर्गत अनेक प्रकारची रॉकॅट्स, हवाई संरक्षण प्रणाली, तोफा, टॅंकर्स, ग्रेनेड् लॉंचर्स, आदीसाठी दारूगोळ्याचे कालबद्ध उत्पादन करण्यात येणार आहे.
लष्करासाठी लागणाऱ्या 152 प्रकारच्या दारूगोळ्यांपैकी फक्त 61 प्रकारचा दारूगोळा उपलब्ध आहे, आणि त्याचा साठाही फक्त दहा दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती कॅगने गेल्यावर्षी लोकसभेत दिली होती. प्रत्यक्षात युद्धकाळात एक महिना पुरेल इतका दारूगोळ्याचा साठा लष्कराकडे कायम असला पाहिजे.