भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती
मुझफ्फरनगर– आंतरराष्ट्रीय सीमेजवळ या महिन्याच्या सुरुवातीला सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची हत्या झाल्याची प्रतिक्रिया म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मात्र या कारवाईचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. मात्र ही कारवाई पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणारी होती, याबाबत लोकांनी विश्वास बाळगावा असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
“सर्व काही झाले आहे. ठिकठाक झाले आहे. विश्वास ठेवा. दोन तीन दिवसांपूर्वीच सर्वकाही व्यवस्थित झाले आहे.’ असे राजनाथ सिंह म्हणाले. भारतीय लष्कराकडून अशा स्वरुपाची कारवाई भविष्यातदेखील केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून भारतीय लष्कराने केलेल्या “सर्जिकल स्ट्राईक’च्या दुसऱ्या स्मृतिदिनीच राजनाथ सिंह यांनी तशाच प्रकारची कारवाई पुन्हा एकदा केली जाईल, असा इशारा दिला आहे, हे विशेष आहे.
सीमा सुरक्षा दलाचे जवान नरेंद्र सिंह यांची 18 सप्टेंबर रोजी हत्या झाली होती. जम्मू काश्मीरच्या रामगड क्षेत्रात झालेल्या या हत्येनंतर लगेचच लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी या प्रकाराचा बदला घेण्यासाठी चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानलाही अशीच वेदना व्हायला हवी, मात्र पहिला गोळीबार “बीएसएफ’ने करू नये, मात्र जर गोळीबाला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली तर गोळ्या मोजू नयेत, अशी सूचना आपण “बीएसएफ’ला केली होती.असेही राजनाथ यांनी सांगितले.