भारतीय क्रिकेटमध्ये गुलाबी क्रांती!
- दुसऱ्या कसोटीसह निर्भेळ मालिका विजयाचे ध्येय
कोलकाता : भारतीय क्रिकेटमध्ये अखेर शुक्रवारी ‘गुलाबी क्रांती’ला प्रारंभ होणार आहे. सुरुवातीला अनिच्छा प्रकट करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांभाळल्यानंतर प्रकाशझोतातील पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवणार जात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचे पारडे बांगलादेशपेक्षा जड आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रकाशझोतातील कसोटी सामन्याला मान्यता दिल्यानंतर सात वर्षांनी गांगुलीच्या प्रयत्नांनी भारतात ‘गुलाबी क्रांती’ अवतरणार आहे. गांगुलीनेच हे शिवधनुष्य पेलताना बांगलादेश क्रिकेट मंडळाला प्रकाशझोतातील कसोटीसाठी राजी केले. अॅडलेड येथे चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याने प्रकाशझोतातील गुलाबी पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर आतापर्यंत ११ प्रकाशझोतातील सामने झाले आहेत. याच मैदानावर प्रकाशझोतातील कसोटीचा प्रस्ताव गतवर्षी ऑस्ट्रेलियाने भारतापुढे ठेवला होता, परंतु भारताने तो फेटाळला होता. परंतु गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर आठवडय़ाभरातच प्रकाशझोतातील कसोटीचे ऐलान त्याने केले. मग गांगुलीचा प्रस्ताव कोहलीने फक्त तीन सेकंदांत मान्य केला.