भाजप सरकारने चहाबरोबर देशही विकायला काढला – डॉ. सुषमा अंधारे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
‘एनआरसी’ सर्व्हेला घरी येणा-या अधिका-यांना आपले कागदी पुरावे देण्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा प्रश्न विचारा, असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी पिंपरीत केले.
शुक्रवारी (दि. 14) सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) विरोधात संविधान बचाव समिती, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने निगडी भक्ती-शक्ती चौक ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत तिरंगी रॅली काढली. पिंपरी चौकात सभेला संबोधित करताना डॉ. सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी उलेमा कौन्सिल पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मौलाना फैज अहमद फैजी, कुलजमाती तंजीमचे मार्गदर्शक मौलाना अब्दुल गफार अशरफी, मौलाना नय्यर नूरी, मौलाना अलीम अन्सारी, हाजी गुलाम रसुल, एस. अझीम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच प्रताप गुरव, डॉ. सुरेश बेरी, धम्मराज साळवे, संतोष जोगदंड, ॲड. मनिषा महाजन, कॉ. गणेश दराडे, हाजी युसूफ कुरेशी, मौलाना अब्दुल गफार, कारी इक्बाल उस्मानी, मनोहर पद्मन, राम नलावडे, विशाल जाधव, कपील मोरे, संजय बनसोडे, चंद्रकांत यादव, गोकूळ बंगाळ, सुधीर मुरुडकर आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.
सुषणा अंधारे म्हणाल्या की, एनआरसी सर्वेला घरी येणा-या अधिका-यांनी विचारा. तुमचे सरकार आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करणार होते, त्याचे काय झाले? मेक इन इंडियाचे काय झाले? देशाचा जीडीपी वाढणार होता, त्याचे काय झाले? तुम्ही चहा विका पण एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी विकायचे ठरले नव्हते. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी चहा बरोबर देशही विकायला काढला आहे. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सीएए, एनआरसी, एनपीआरच्या (CAA, NRC, NPR) च्या कागदी घोड्यात नागरिकांना अडकवून टाकण्याचा त्यांचा डाव आहे. देशाची ‘धर्मनिरपेक्षता’ ही संकल्पनाच रद्द करण्याचा आणि ‘संविधानात’ हवा तसा बदल करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने रचला आहे. हे हाणून पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन डॉ. सुषमा अंधारे यांनी केले.