भाजप सरकारचे हजारो कोटींचे घोटाळे : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
इचलकरंजी – ईव्हीएम-मतदान यंत्रांमध्ये घोटाळे करून राज्या-राज्यांत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारची हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येत आहेत. जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर यावयाचे आणि मोठमोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक करावयाची, असा एकमेव कार्यक्रम मोदी सरकार करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
राष्ट्रीय कॉँग्रेसच्यावतीने जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेमध्ये चव्हाण बोलत होते. शनिवारी घोरपडे नाट्यगृह चौकातील सभेत वक्त्यांनी मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार यांच्या फसव्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका केली.भाषणात पृथ्वीराज चव्हाण यांनी, नोटाबंदी, जीएसटी, राफेल विमान खरेदी घोटाळा, आदी मुद्द्यांची माहिती दिली व ते म्हणाले, दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारची ‘मेक इन इंडिया’ योजना फोल ठरली आहे. यातून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांत गुंतवणूक येण्याऐवजी देशातील छोटे-मोठे उद्योग बंद पडल्याने लाखोजणांचा रोजगार गेला.
आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, फडणवीस हे फसवणीस मुख्यमंत्री आहेत. खोटे बोलून राज्य चालवितात. जनतेचा आता मोठा रोष निर्माण झाला आहे. हा जनसागर भाजपला अरबी समुद्रात बुडविल्याशिवाय राहणार नाही. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासाठी विविध योजना खेचून आणल्या. त्या योजनांची वाट लावून हाळवणकर यांनी वस्त्रोद्योग मोडकळीस आणला. कारखानदार सध्या यंत्रमाग भंगारात विकायला लागले आहेत. शहरातील आयजीएम रुग्णालयाची वाट लावली. झोपडपट्टी, रेशन योजनेचा फज्जा उडविला. या सगळ्याचा विचार करून सध्या ‘करो या मरो’ची लढाई सुरू झाली आहे. यात जिंकलात, तर वाचलात, असे आवाहन केले.
सभेमध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व शशांक बावचकर यांनी सूत्रसंचालन केले. सभेसाठी प्रदेश महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, आमदार डी. पी. सावंत, आमदार शरद रणपिसे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री जयवंतराव आवळे, आदी उपस्थित होते.