भाजप-शिवसेनेचे भांडण म्हणजे ‘वरुन तमाशा, आतुन कीर्तन’ – अशोक चव्हाण
बुलढाणा – भाजप – शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. विकासाच्या नावाखाली राज्याची दिशाभूल करत आहेत. त्यांची भांडणेसुद्धा दिखाऊ असून ‘वरून तमाशा, आतून कीर्तन’ असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेंतर्गत चिखलीतील (बुलढाणा) जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे, माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार, आ. यशोमती ठाकूर, आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके आदी नेते उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. ‘आपलं सरकार’ या भाजप-शिवसेना सरकारच्या घोषणेचा धागा धरून ‘आपलं सरकार, घोषणा दमदार’ असाच या सरकारचा कारभार असल्याचे त्यांनी सांगितलं. या सरकारला ‘फसणवीस’ सरकारच म्हटले पाहिजे. सरकारकडे नियोजन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसा शिल्लक राहिलेला नाही. म्हणूनच अजूनही कर्जमाफी पूर्ण झालेली नाही. हे महाराष्ट्रासाठी दळभद्री ठरलेले सरकार आहे, असे सांगून पुढील निवडणुकीत हे सरकार उलथवून लावण्याचे आवाहन त्यांनी केले.