भाजप आमदारांनी महापालिकेत नव्हे, तर विधानसभेत लक्ष घालावे
शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांचा आमदार लक्ष्मण जगतापावर निशाना
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेत आज (सोमवारी) गोंधळ झाला. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. खाजगी वाटाघाटीने भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्यात धोरणात बदल करण्यात येत आहेत. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांना बोलू न देता हा प्रस्ताव महापाैरांनी तहकूब केला. त्यावरुन शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले की, भाजप आमदारांनी महापालिकेत नव्हे तर राज्याच्या विधानसभेत लक्ष घालून शहराचे प्रश्न सोडवावेत, अशी खोचक टीका कलाटे यांनी पत्रकार परिषदेत यावेळी केला.
पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी वाटाघाटीने भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्याचे धोरण 2013 मध्ये महापालिकेने निश्चित केले होते. त्या धोरणात सत्ताधारी भाजपने पुन्हा बदल करण्याचे ठरविले असून त्यावरुन भाजप नगरसेवकात दुफळी निर्माण झाली आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी यापुढे आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भू-संपादन विषयावरुन महासभेत बोलू न दिल्याने भाजप नगरसेवक संदीप वाघेरे, शत्रूघ्न काटे, तुषार कामठे, सचिन चिंचवडे यांच्यासह अन्य काही नगरसेवकांनी थेट पंगा घेण्यास सुरुवात केलेली आहे. तर शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले की, वाकड, रहाटणी यासह पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत शेकडो नागरिक, शेतक-यांचा हा विषय आहे. खाजगी वाटाघाटीने भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्याचे धोरणात बदल करण्याचा नेमका हेतू काय आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून हे बदल केले जात आहेत.
या विषयावर सत्ताधारी व विरोधकांना बोलण्यास मनाई केलेली आहे. चर्चा न करताच विषय तहकूब केलेला आहे. ज्या नगरसेवकाची एक इंचही जागा गेली नाही. त्यांनी हा प्रस्ताव आणला आहे. आम्ही हे स्वताःसाठी नव्हे लोकांकरिता भांडत आहे. स्थानिक शेतक-यांनी भाजप आमदारांना पार्टनर न केल्यानेच हा विषय आणला आहे. त्यामुळे आमदारांनी महापालिकेत न लक्ष घालता, विधानसभेत लक्ष घालून शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी खोचक टीका कलाटे यांनी केली आहे.