भाजपाचा रगडापेटीस, ढोकला छाप विजय; उद्धव ठाकरे यांची टीका
मुंबई – मुंबई डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची हे भाजपाचे धोरण आहे. चंद्रपूरच्या पत्रकार संघापासून मुंबईच्या प्रेस क्लब निवडणुकीतही भाजपा त्यांचे पॅनल उतरवत आहेत. शिवसेना स्वाभिमानाने लढत असून ही लढाई अशीच सुरू राहील. हाऊसिंग फेडरेशनचा विजय मोठा वाटणाऱ्यांना उद्या पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तवले. आंतरराष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाने एकतफी निवडणूक जिंकल्याचा दावा माध्यमांत केला असला तरी ते भाजपाप्रणीत ‘रगडापेटीस, ढोकला छाप’ असा सर्वपक्षीय विजय असल्याचा टोला त्यांनी लगावला.
शिवसेनेचा दारूण पराभव कसा झाला हे ढोल बडवून सांगणाऱ्यांची अक्कल गहाण पडली असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात त्यांनी भाजपाच्या विजयावर तोफ डागली.
काय म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी..
* कोणतीही निवडणूक सत्ता व धनाचा वापर करून जिंकायची, हे भाजपाचे धोरण आहे. असा विजय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएमच्या मदतीने मिळाला तरी त्या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वास दिले जाते, हा मोठाच विनोद आहे.
* या संस्थेतही भाजपाची भ्रष्ट घुसखोरी झाल्यामुळेच शिवसेना रिंगणात उतरली. सेना रिंगणात उतरताच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम असे एक सर्वपक्षीय पॅनल उभा केले गेले. शिवसेना स्वतंत्र लढूनही १२५० मते तर भाजपाच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीयांना १४५० मते मिळाली.
* मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, त्यांचे राजकीय ‘अर्थमंत्री’ हे जणू हाऊसिंग सोसायट्यांची मते विकत घेण्यासाठीच या निवडणुकीत उतरले. शिवसेनेला विजयी होऊ द्यायचे नाही यासाठी भाजपाने पाच कुबडय़ा वापरल्या. त्यामुळे नैतिक विजय हा शिवसेनेचाच झाला.
* मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने सरकारदरबारी पाठवला आहे व यामुळे अनेकांना दिलासा मिळेल. त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी ही आता जिंकलेल्या नव्या सर्वपक्षीय कडबोळे पॅनलवर येऊन पडली आहे.