भाजपला २५०, रालोआला ३०० जागा : सट्टा बाजाराचे भाकित
मुंबई : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आघाड्या आणि प्रचारसभांनाही वेग आला आहे. राजकीय तज्ज्ञ आपले अंदाज वर्तवू लागले आहेत. राजस्थानच्या जोधपूरनजीकच्या फालोदी सट्टा बाजाराने भाजपा आणि भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती दिली आहे. भाजप प्रणीत एनडीए पुन्हा सरकार स्थापन करेल, भाजपला २५० आणि आघाडीला ३००-३१० जागा मिळतील, असे सट्टेबाजाराचे म्हणणे आहे.
राजस्थानमध्ये भाजपाला २५ पैकी १८ ते २० जागा मिळतील, असा अंदाज सट्टेबाजाराने वर्तवला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे मतदारांची भावना बदलली आहे, असा सट्टाबाजाराचा कयास आहे.
सर्जिकल स्ट्राइकच्या आधी या बाजारातील बुकींनी भाजप प्रणित रालोआला २८० आणि भाजपाला २०० च्या आसपास जागा मिळतील, असे भाकित केले होते. पण बालाकोट हल्ल्यामुळे मतदारांचे मन बदलले आहे. या हल्ल्यामुळे भाजपा आणि एनडीएच्या जागा वाढतील, असे अनुमान बुकींनी काढले आहे.
फालोदी सट्टा बाजाराने काँग्रेसच्या जागात घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आधी काँग्रेसला १०० च्या आसपास जागा मिळतील असा बुकींचा अंदाज होता. तो आता ७२ ते ७४ पर्यंत खाली आला आहे.