भांडणं झाली तर खून करून या, कुलगुरूंचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराम यादव आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. विद्यार्थ्यांना संबोधून भाषण करत असल्याचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते विद्यार्थ्यांना सल्ला देत आहेत. जर आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्याने कधी, कोणाबरोबर भांडण केले तर त्याने मार न खाता मारून आले पाहिजे. इतकंच नव्हे तर जर तुम्हाला शक्य असेल तर त्याचा खूनही करून या. नंतरचं आम्ही पाहू, असा अजब सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना जाहीर कार्यक्रमात दिला.
पूर्वांचल विद्यापीठाचे कुलगुरू राजाराज यादव हे गाजीपूर येथील एका परिषदेदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करत होते. ‘उच्च शिक्षणासमोरील आव्हाने’ या विषयावर आयोजित परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, युवा विद्यार्थी तोच असतो जो दगडावर पाय मारून पाण्याची धार त्यातून काढू शकतो. तो आपल्या जीवनात जो संकल्प निश्चित करतो. तो संकल्प पुर्णत्वास नेतो. अशा विद्यार्थ्यालाच पूर्वांचल विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणतात.
त्यानंतर ते म्हणाले, जर तुम्ही पूर्वांचल विद्यापीठाचे विद्यार्थी असाल तर माझ्याकडे कधीही रडत येऊ नका. एक गोष्ट सांगतो, जर एखाद्याशी भांडण झालं तर त्याला मारहाण करून यायचं. तुमची इच्छा झाली तर त्याचा खून करून या, त्यानंतरचं मी पाहतो.
त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांनी प्रतिसाद दिला. आता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व बाजूंनी कुलगुरूंवर टीका होताना दिसत आहे. जबाबदारीचे पद असलेल्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे.