भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याने महिलेला जबर मारहाण
नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांना खायला घातल्यावरून दिल्लीतील लाजपत नगरात एका काश्मिरी कुटुंबाला कॉलनीतील रहिवाशांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कॉलनीतील रहिवाशांनी मारहाण केली. तसेच काश्मीर आणि त्यांच्याबद्दल अभद्र भाषेचा वापर केला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मीरा अहमद या महिलेला मारहाण करण्यात आली. मीरा अहमद श्वानप्रेमी असून, त्या रात्री भटक्या कुत्र्यांना खायला घालतात. यावरून कॉलनीतील लोक त्यांच्यावर नाराज होते. काल रात्रीही त्या कुत्र्यांना खायला घालत होत्या. कॉलनीतील काही लोकांनी त्यांना विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. मीरा यांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती डीसीपी चिन्मय बिस्वल यांनी दिली.