बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवला
कोल्हापूर – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात एक धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली आहे. या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यातील शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या रविवारी कर्नाटकात जाऊन आंदोलन छेडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परवानगीने या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांकडून दबाव येत होता. या दबावाला बळी न पडता ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले. त्यानंतर पोलिसांचा दबाव शमला. मात्र, कर्नाटक सरकारने हा पुतळा हटवला आहे. सरकारनेच आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान, विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनं करण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला आहे. गावकऱ्यांनी यासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्याठिकाणी गर्दी केली. दरम्यान कर्नाटक सरकारनं शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे