बिहार पोलीस महासंचालकांनी हातात भाजपचा झेंडा घेणेच बाकी; सामनातुन घणाघात
मुंबई: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपास प्रकरणावर काल सुप्रील कोर्टाने निकाल दिला आहे. हा तपास कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत आज सामना वृत्तपत्राचा अग्रलेख प्रसिद्ध झालेला आहे. या अग्रलेखातून बिहारच्या पोलीस महासंचालकांवर निशाणा साधण्यात आलेला आहे.
“न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय आणि कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये. ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी आणि हातात राजकीय पक्षाचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करुच नये. सुशांत प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला हवाच”, असं सामना अग्रलेखात म्हटलेले आहे.
“सुशांतच्या कुटुंबियांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायलाच हवा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांच्यावर सुरु असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करत असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळालाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य आणि न्यायाच्या मार्गावर असतानाचा त्यांना रोखले हे बरोबर नाही”, अशी खंतही सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आलेली आहे.
“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील, दिल्लीतील आणि बिहारसारख्या राज्यांतील काही मंडळींना अत्यानंदाचे भरतेच आले आहे. बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने न्याय, सत्यचा धोशा लावून नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली”, अशी टीकाही सामना अग्रलेखातून नितीश केली आहे.
“बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल आणि त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज भारताची राज्य घटना ही अश्रू ढाळत असेल. देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा शंभर नंबरीच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही”, असंही अग्रलेखात नमूद केले आहे.
“जिंकल्याच्या आविर्भावात पत्रकारांसोमर म्हणाले, ये न्याय की अन्याय पर जीत है, पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते. पांडे यांचे म्हणणे असे की, सुशांतप्रकरणी मुंबई पोलीस योग्य दिशेने तपास करीत नाहीत. बिहार पोलिसांच्या तपासात अडथळे आणत आहेत. हे त्यांचे विधान सत्याला धरुन नाही. सुशांतच्या परिवाराने त्यांचा पुत्र गमावला आणि सुशांतने नेमकी आत्महत्या का केली हे रहस्य उलगडण्याच्या कामी पोलीस लागलेच आहेत. पण हे रहस्य म्हणजे पाताळात दडवलेली कुपी आहे. ती कुपी फक्त बिहारचे पोलीस किंवा सीबीआयलाच शोधता येईल हा भ्रम आहे”, असंही सामना अग्रलेखात म्हटले आहे.