बारावीचे अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरूवात
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचे अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून यंदा पहिल्यांदाच सरल या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरले जाणार आहेत. यासाठी नियमित तसेच पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी राज्यातून साधारण 15 लाख विद्यार्थी बसतात. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या तारखा मंडळाकडून जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी 1 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत नियमित शुल्कासहwww.mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज भरायचे आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी यंदा प्रथमच सरल या डेटाबेसवरून अर्ज भरावयाचे आहेत तर, व्यावसायिक अभ्यासक्रवाल्या विद्यार्थ्यांची यात नोंद नसल्याने त्यांनी प्रचलित पद्धतीनुसार अर्ज करायचे आहेत, असेही मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सांगितले आहे. दरम्यान जे विद्यार्थी 21 नंतर अर्ज भरतील त्यांना विलंब शुल्क द्यावे लागणार असून विलंब शुल्क देऊन अर्ज करण्याची तारीख 31 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आले आहे. बारावीचे हे अर्ज स्वीकारत असताना सरल डेटामध्ये या विद्यार्थ्यांची आधीपासूनच नोंद असणे आवश्यक आहे.
ऑफलाइन प्रवेशार्थी सापडणार
यंदा बारावीचे अर्ज हे सरल नोंदणीनुसार होणार आहेत. याचाच अर्थ अकरावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमानुसार ऑनलाइन पद्धतीने झाले आहेत, त्यांना वेगळी नोंद करायची आवश्यता भासणार नाही. मात्र, जे प्रवेश छुप्या पद्धतीने झाले आहेत. त्यांची ऑनलाइनमध्ये नोंद नसल्यामुळे हे चुकीचे प्रवेश या निमित्ताने बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.