बारावीची परीक्षा आज पासून सुरु…
मुंबई | महाईन्यूज|
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षा आज पासून सुरु होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. १८ फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे, असे बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रे आहेत. या परीक्षेसाठी विज्ञान शाखेतील ५ लाख ८५ हजार ७३६ विद्यार्थी, कला शाखेतून ४ लाख ७५ हजार १३४ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतून ३ लाख ८६ हजार ७८४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५७ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने मंडळातर्फे राज्यात २७३ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यावर्षीच्या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे.