बापरे! शालेय मुलांची सहल थेट स्मशानभूमीत…
सोलापूर | महाईन्यूज
भूत-प्रेत, स्मशान याविषयी समाजात पिढय़ान् पिढय़ा भीतीचे वातावरण कायम राहिलेले आहे. बालवयापासूनच हे भीतीचे संस्कार घडविले जातात. जवळच्या नात्यातील एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीविषयी बालमनाला अनामिक भीती जाणवते. ही भीती मनातून कायमची नष्ट करण्यासाठी आणि बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी तालुक्यातील ‘स्नेहग्राम’ निवासी शाळेतील मुला-मुलींची चक्क स्मशानभूमीची सहल घडविण्यात आली. स्मशानात जेथे शोकाचे, दु:खाचे अश्रू पाहायला मिळतात, तेथे स्नेहग्रामच्या मुलांनी अगदी आनंदात नीडरतेचे धडे गिरविले आहेत. ही अनोखी सहल मुलांच्या मनातील भीतीचे समूळ उच्चाटन करणारी ठरली आहे.
समाजात सर्वाधिक वंचित राहिलेल्या भटक्या जमातीच्या निराश्रित, अनाथ व वंचित मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विनया आणि महेश निंबाळकर या दाम्पत्याकडून बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे स्नेहग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून निवासी शाळा चालविली जाते आहे. स्थलांतरित, शहरात रस्त्यांवर भीक मागणारी शाळाबाह्य़ मुले, अनाथ, निराधार, वंचित व संघर्षग्रस्त मुले, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुले, माळरानावर पाली टाकून राहणाऱ्या दुर्लक्षित भटक्या जाती-जमातींची मुले अशांना निंबाळकर दाम्पत्याने एकाच छताखाली आणून औपचारिक शिक्षणासह कौशल्याधारित शिक्षण आणि व्यावहारिक जीवनानुभव देण्याचे व्रत चालविले आहे.