बांगलादेशचा विंडीजवर 19 धावांनी विजय
- तिसऱ्या सामन्यासह 2-1 ने जिंकली मालिकाही
लॉडेरहिल्स: लिटन दास आणि महमदुल्लाहच्या आक्रमक फलंदाजीनंतर मुस्तफिझुर रेहमानच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 19 धावांनी पराभव केला. या विजयामुळे बांगला देशने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगला देशने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 184 धावांची मजल मारली. विंडीजसमोर विजयासाठी 185 धावांचे लक्ष्य होते. मात्र त्यानंतर झालेल्या पावसामुळे विंडीजला 17.1 षटकांत 155 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले होते. परंतु विंडीजला 17.1 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 135 धावांचीच मजल मारता आली.
प्रत्युत्तरात खेळणाऱ्या वेस्ट इंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर वॉल्टन व फ्लेचर, तसेच आणि अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स केवळ 32 धावांतच परतल्याने विंडीजसाठी हे आव्हान अवघड झाले होते. त्यानंतर दिनेश रामदीन आणि रोव्हमन पॉवेल यांनी फटकेबाजी करताना चौथ्या गड्यासाठी 5.3 षटकांत 45 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. मात्र विंडीजच्या 77 धावा झाल्या असताना रामदीनला बाद करत रुबेल हुसेनने बांगलादेशला महत्त्वपूर्ण बळी मिळवून दिला.
त्यानंतर आलेल्या आंद्रे रसेलने फटकेबाजी करताना रोव्हमन पॉवेल (23) आणि कर्णधार कार्लोस ब्रेथवेट (5) सोबत दोन छोट्या भागीदारी करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रसेलने ब्रेथवेटच्या (5) साथीत 3.2 षटकांत 32 धावांची भागीदारी केली. ज्यामुळे अखेरच्या चार चेंडूंत 24 धावांची गरज असताना रसेलला केवळ 5 धावा करता आल्या आणि विंडीजला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी रसेलने 21 चेंडूंत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 47 धावांची खेळी करत एकाकी लढत दिली. तर बांगलादेशच्या मुस्तफिझुर रेहमानने 3.1 षटकांत 31 धावांत 3 गडी बाद करत विंडीजला रोखण्यात मोलाचा वाटा उचलला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याऱ्या बांगलादेशने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या 21 चेंडूंतच संघाचे अर्धशतक फलकावर झळकावत संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. यावेळी सलामीवीर तमिम इक्बाल आणि लिटन दास यांनी 4.4 षटकांत 61 धावांची भागीदारी नोंदवली. तमिमला (21) बाद करीत ब्रेथवेटने वेस्ट इंडीजला पहिला बळी मिळवून दिला. तर लागलीच सौम्य सरकार परतल्याने बांगलादेशची 2 बाद 66 अशी आणि मुश्फिकुर रहीम बाद झाल्याने बांगालादेशची 3 बाद 97 अशी घसरगुंडी झाली होती.
यावेळी एका बाजूने फटकेबाजी करणारा लिटन दासदेखील संघाचे शतक फलकावर लागल्यावर परतल्याने त्यांच्या 4 बाद 102 धावा झाल्या. दासने 32 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर त्यानंतर आलेल्या महमदुल्लाहने 20 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार खेचत 32 धावांची तडाखेबाज खेळी करताना बांगलादेशला 184 धावांची मजल मारून दिली.