‘बदलापूर’नंतर मला वारंवार मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागलं , वरुणचा खुलासा
तीन वर्षांपूर्वी आलेला अभिनेता वरूण धवनचा ‘बदलापूर’ चित्रपट चांगलाच गाजला. यापूर्वीच्या चित्रपटातून ‘चॉकलेट बॉय’ अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करणाऱ्या वरुणच्या करिअरला एक वेगळी कलाटणी ‘बदलापूर’ मुळे मिळाली. त्याची निवड ही योग्य होती हे त्यानं ‘बदलापूर’च्या यशानं सिद्ध करून दाखवलं.
एका चोरीच्या घटनेदरम्यान रघूच्या देखत त्याची बायको आणि मुलाचा खून होतो. पंधरा वर्षांनंतर रघू खुन्यापर्यंत पोहोचतो साधरण अशी पार्श्वभूमी या चित्रपटाच्या कथेची आहे. मात्र या चित्रपटानंतर मला वारंवार मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी जावं लागलं असा खुलासा वरूणनं केला आहे. इफ्फीमध्ये वरुणनं उपस्थिती लावली त्यावेळी त्यानं आतापर्यंत न सांगितलेला अनुभव प्रेक्षकांना सांगितला.
या चित्रपटात रघुचं पात्र साकारताना मला वारंवार अस्वस्थ वाटत होतं. त्या पात्राचा माझ्या मनावरही खोल आणि नकारात्मक परिणाम होऊ लागला इतका की यातून बाहेर येण्यासाठी मला वारंवार मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागलं होतं. सुदैवानं या नकारात्मक भावनेतून मी लवकर बाहेर पडलो. मानसोपचार घेणं यात गैर काहीच नाही तब्येतीप्रमाणे मनाचं स्वास्थही बिघडू शकतं त्यामुळे त्यावर योग्य उपाचार करायला हवेत असं म्हणत वरुणनं मानसिक स्वास्थाविषयीही तरुणांमध्ये जागृती निर्माण करण्यास पुढाकार घेतला. याआधी ‘पद्मावत’ चित्रपटात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकरल्यानंतर रणवीर सिंगनं मनासोपचार घेतले होते.